शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा या सभागृहात जाणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रह धरला जात आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक सूचक विधान केले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विविध विषयांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत असणं हे एक चांगले संकेत असतील. यामुळे आमच्या आमदारांना एक बळ मिळेल, असे संजय राऊत म्हणाले.

विधानपरिषदेच्या विषयाची चर्चा महाराष्ट्रात होईल. राज्यसभा जर महाविकासआघाडीतील एखाद्या पक्षाला दिली असेल, तर आमचे २० आमदार आहे. महाविकासाआघाडीत सर्वाधिक २० आमदार आमच्या पक्षात आहेत. आमचे २० आमदार असतानाही आम्ही राज्यसभा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली. त्यामुळे आता यावर मविआतील जे पक्ष आहेत, प्रमुख पक्ष किंवा इतर यांच्याशी सोबत बसून चर्चा करावी लागेल, असे संजय राऊतांनी म्हटले.उद्धव ठाकरेंची इच्छा ते स्वत: सांगतील. पण आम्हाला सर्वांना असं वाटतंय की उद्धव ठाकरेंनी या राज्याचे नेतृत्व केले आहे. त्यांनी संकटकाळात उत्तम नेतृत्व केले आहे. त्यांच्यासारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे एक चांगले संकेत असतील आणि यामुळे आमच्या आमदारांना एक बळ मिळेल, असेही संजय राऊतांनी सांगितले.

दरम्यान येत्या मे महिन्यात विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. मात्र, सध्याच्या विधानसभा संख्याबळानुसार महाविकास आघाडीला या ९ पैकी केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागेसाठी ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळावी, असा आग्रह धरला जात आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षांकडून याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

उद्धव ठाकरे यांच्या फेरनिवडीचा प्रश्न केवळ त्यांच्या वैयक्तिक इच्छेपुरता मर्यादित नसून, तो महाविकास आघाडीच्या (MVA) संयुक्त रणनीतीवर अवलंबून आहे. सध्याच्या राजकीय गणितांनुसार, विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या या लढतीत महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. महाविकास आघाडीकडे असलेल्या सुमारे ४८ ते ५० आमदारांच्या जोरावर एका उमेदवाराला निवडून आणणे सोपे असले, तरी दुसऱ्या जागेसाठी त्यांना मित्रपक्षांच्या मदतीची आणि अतिरिक्त मतांची मोठी गरज भासणार आहे. त्यामुळे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (SP) आणि काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीला कशा प्रकारे पाठबळ दिले जाते आणि मतविभाजन टाळण्यासाठी कोणती तडजोड केली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!